अशोक चव्हाण यांच्यावर ईडीचा दबाव आहे का? काँग्रेस नेत्याचा सवाल
मुंबई | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांची प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याबरोबर बैठक पार पडली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यावर परखड भाष्य करण्यात आलं.
रमेश चेन्नीथला म्हणाले की, मी एक स्पष्ट सांगतोय. अशोक चव्हाण यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसमधून एकही कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही. अशोक चव्हाण एकटेच पक्ष सोडून जात आहेत. जो कुणी पक्ष सोडून जाईल, त्याच्यासोबत कार्यकर्ताही राहणार नाही, महाराष्ट्रातील जनताही राहणार नाही. परवा दुपारी २ वाजेपर्यंत आमच्याबरोबर वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत अशोक चव्हाण होते. पण त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन दिवसांपूर्वीच ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना भेटले. दिल्लीतील अनेक नेत्यांशी चर्चा केली. परत येऊन आमच्याबरोबर मीटिंगमध्ये बसले होते.
हेही वाचा – फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील या धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या..
त्यांनी काँग्रेस का सोडली? हे त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यांच्याकडे याचं उत्तर नाहीये. काँग्रेसचं धोरण चुकीचं आहे का? काँग्रेसनं त्यांच्यावर काय अन्याय केला आहे? एक राजकीय नेता म्हणून त्यांनी हे स्पष्ट करायला हवं. काँग्रेसनं त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री बनवलं. १५ वर्षं ते काँग्रेसच्या काळात मंत्री होते. राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षही होते. पक्षानं त्यांना सगळं दिलं. नेता बनवलं. तरीही ते पक्ष सोडून जात आहेत, असं ते म्हणाले.
आम्ही राजकारणात विचारसरणीने काम करणारे लोक आहोत. एकही काँग्रेसवाला त्यांच्यासोबत जाणार नाही. आयाराम-गयाराम कुणालाही आवडत नाहीत. त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांच्यावर ईडीचा दबाव आहे का? सीबीआयचा दबाव आहे का? ज्या व्यक्तीने एका पक्षात ४८ वर्षं काम केलं, मोठमोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळली, ती व्यक्ती पक्ष का सोडतेय हे सांगण्याची जबाबदारी असते ना? नांदेडचे सर्व नगरसेवक इथे आले होते. त्यांनाही अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं नाही, असंही चेन्नीथला म्हणाले.