रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या एका जागेवर मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे
अमित गोरखे यांची भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे मागणी
पिंपरी : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या महाराष्ट्रातील सहा जागांपैकी एका जागेवर मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी मातंग समाजाचे नेते तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. यासंदर्भात गोरखे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
अमित गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमातीमध्ये हिंदू मातंग समाज लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असून जन्मापासूनच हिंदू असल्याचा अभिमान हा समाज बाळगून आहे. महाराष्ट्रात मातंग समाजाची ताकद जास्त असून सुद्धा आजवर कुठल्याही पक्षाने मातंग समाजाला राज्यसभा अथवा विधान परिषदेवर संधी दिलेली नाही. तरी पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेतील सहा जागापैकी महाराष्ट्रातील एका जागेवर मातंग समाजातील कुठल्याही नेत्याचा विचार करून मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी अमित गोरखे यांनी यांनी केली आहे.
त्यांच्या मागणीनुसार मातंग समाजातील कुठल्याही नेतृत्वाला अशी संधी कुठल्याच पक्षाने दिलेली नाही. ती संधी हिंदू मातंग असलेल्या या समाजाला भाजपाने द्यावी. भाजपा हा खऱ्या अर्थाने सर्व स्तरातील समाजाचा न्याय देणारा पक्ष आहे, त्यामुळे या मागणीचा विचार भारतीय जनता पार्टी नक्की करेल असा विश्वास वाटतो, असे अमित गोरखे यांनी पत्रात नमूद केले आहे.