मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला शेवटचा इशारा; म्हणाले..

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम २४ ऑक्टोबरला संपणार आहे. मात्र अजून सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शेवटचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारच्या वतीने आम्हाला अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण आम्हाला असं वाटतं आज किंवा उद्या शंभर टक्के आरक्षण मिळेल. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही शब्द दिलेला आहे आणि त्यांनी काल दिलेला शब्द मराठ्यांना अपेक्षित होता. मात्र आता सरकारला एक तासही वाढवून मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटची विनंती आहे की, मराठा समाजाला शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या शब्दाला डाग लागू देऊ नये.
हेही वाचा – चिखली-तळवडेतील रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी २६ व २७ ऑक्टोबरला शिबीर
नेत्यांना गाव बंद केले नाही, फक्त आमच्या गावात यायचं नाही, असं म्हटलं आहे. तुम्ही आम्हाला आपलं मानत नाहीत. मग तुम्ही आमच्या गावात कशाला येता? येऊ नका. मराठे तुमच्या दारात उभे राहणार नाहीत. तुम्हीही आमच्या दारात उभं राहू नका. तुम्हाला गावात यायचं असेल तर आरक्षण घेऊनच या, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
ओबीसी नेते तायवाडे यांनी ईडब्ल्यूएसवर मराठा समाजाने समाधानी राहण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. समाधानी राहायचं का नाही ते आम्ही ठरवू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.





