मोठी बातमी! राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानुसार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना काढण्यात आली आहे. यानुसार राहुल गांधी यांना वायनाड मतदारसंघातली खासदारकी पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे राहुल गांधी आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
लोकसभा २०१९ निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचा उल्लेख केला होता. सर्वच चोरांचं आडनाव मोदी कसं असतं? असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. यावरून भाजपाचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात आधी सत्र न्यायालय व नंतर गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना २ वर्षांची कमाल शिक्षा ठोठावली होती.
हेही वाचा – Chandrayaan-३ ने पाठवलं चंद्राचं पहिलं छायाचित्र, ISRO शेअर केला व्हिडीओ
Lok Sabha Secretariat restores membership of Wayanad MP Rahul Gandhi after the Supreme Court on Friday (August 4) stayed his conviction in the ‘Modi’ surname remark case.
He was disqualified from the lower house in March 2023. pic.twitter.com/UBE3FvCGEN
— ANI (@ANI) August 7, 2023
यानंतर राहुल गांधींची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती. मात्र, याविरोधात राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. सर्वाधिक शिक्षा देण्याची गरज काय होती? असा सवाल करत न्यायालयानं या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यानंतर त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे.