कोहलीने क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदल शिकावे!
सुनील गावस्कर यांचा सल्ला
इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-४ अशा फरकाने गमावल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे. कोहलीला व्यूहरचनेच्या बाबतीत बरेच शिकायची आवश्यकता आहे. सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदल शिकावे, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.
‘‘दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्याने हे सिद्ध केले की, कोहलीला अजून बरेच शिकायचे आहे. योग्य क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदलांची समयसूचकता यामुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. याच गुणाचा कोहलीमध्ये अभाव जाणवला. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून आता दोन वष्रे झाली आहेत,’’ असे गावसकर यांनी सांगितले.
गेल्या १५ वर्षांतील हा परदेशातील सर्वोत्तम कसोटी संघ आहे, असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले होते. त्यावर गेले काही दिवस बरीच चर्चा होत आहे. कोहलीला सामन्यानंतरसुद्धा हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा आपली सहमती दर्शवली होती. याबाबत गावसकर म्हणाले, ‘‘कदाचित कोहलीला चुकीच्या वेळी हा प्रश्न विचारला गेला असावा. पराभवामुळे तो खचला असावा. मात्र कोणताही कर्णधार तुम्ही बरोबर आहात, आम्ही चुकलो आहोत, असे म्हणत नाही.’’