नोटबंदीमुळे भारत देश आर्थिक संकटात सापडणार? नाना पटोलेंचा मोदींवर घणाघात
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत सर्वांना बँकेत जाऊन नोटा बदलून घेता येणार आहे. २३ मे पासून २ हजार रूपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
नाना पटोले म्हणाले की, सध्याचं केंद्रातलं सरकार हे घोषणाबाज सरकार आहे. सामान्य लोकांच्या खिशातले पैसे काढायचे, हे मोदी सरकारने ठरवलंच आहे. सध्याच्या सरकारची कृती ही महागाईची आहे. केंद्र सरकार देश विकून खात आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांना हाकलले त्याचप्रमाणेच भाजपलाही हाकलायची वेळ आली आहे.
हेही वाचा – २ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी SBI चा मोठा निर्णय, गाईडलाईन्स केल्या जारी
खोटरडी व्यवस्था, लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. मी मोदीसारखा खोटारडा माणूस नाही. मोदींना सांगितले होते की, सैनिकांचे ड्रेस सोलापूरात शिवतो. मात्र आता सरकारने सैनिकच ठेवले नाहीत त्यांचे खासगीकरण केलं. सोलापुरात हुतात्मे, महात्मे आणि क्रांतिवीर आहेत. सोलापूरचे पूर्वीचे खासदार हे मोठ्या अंगठ्या घालून यायचे आणि लोकसभेत झोपत होते, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका केली.