‘प्लॅन बी म्हणजे आम्ही सगळीकडे सतर्क आहोत’; नाना पटोलेंचं सुचक विधान
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी एका मुलाखतीत कोणत्याही कारणामुळे महाविकास आघाडी झाली नाही तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे. काँग्रेसचा हा प्लॅन बी काय आहे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, आतापर्यंत जी परंपरा राहिली आहे ती म्हणजे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होतो. ही आतापर्यंतची लोकशाहीची परंपरा आहे. ज्या पद्धतीने २०२४ मध्ये काँग्रेस पक्षाला धोका मिळाला, त्यामुळे आम्ही सतर्क आहोत. त्या धोक्यामुळे महाविकास आघाडीत ज्या गोष्टी त्या-त्या वेळेस ठरतील, ज्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा असेल, मुख्यमंत्री कोणाचा बनेल यासंबंधीचा निर्णय असेल तेव्हा काँग्रेस सतर्क असेल.
हे सगळे निर्णय त्या-त्या वेळी घेतले जातील. परंतु आज काँग्रेस पक्ष म्हणून, पक्षाचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की, माझा पक्ष प्रत्येक ठिकाणी उभा असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे आणि मी ते करतोय, असंही नाना पटोले म्हणाले.