महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र पहिला
मुंबई : भारतातील जलाशयांच्या गणनेचा अहवाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक पटकावला आहं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
‘जलयुक्त शिवार’चे यश ! जलसंवर्धनात आपला महाराष्ट्र पहिला! केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे, हे सांगताना मला अत्यानंद होतो. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. २०१८-१९ या वर्षात ही गणना करण्यात आली. या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत. जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंवर्धनाच्या योजनांना लोकचळवळ बनविणार्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, सामाजिक संघटनांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता असेच आपले सहकार्य जलयुक्त शिवार २.० मध्येही अपेक्षित आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.