‘महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे, मख्खमंत्री आहेत’; संजय राऊतांची खोचक टीका
विरोधकांना ईडी, सीबीआय, इओडब्ल्यूच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जातंय
![Sanjay Raut said that in Maharashtra, there is not a Chief Minister, but a Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/eknath-shinde-and-sanjay-raut-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी तब्बल ९ महिन्यानंतर संपली आहे. आता न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत राहणार असल्याचं चित्र सध्या दिसू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर खोचक टीका केली आहे.
या राज्यात सरकारच अस्तित्वात नाहीये. म्हणून हा गदारोळ आहे. लाल वादळ येऊन ठेपलंय. किती काळ त्यांना रोखणार तुम्ही. इथे अराजकीय ठिकाणी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटेल हे त्यांना माहिती आहे का? ते दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करतायत. हे लोक महाराष्ट्रात खतम करायला निघाले आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. माविआनं ठरवलंय की त्याविरोधात रान उठवायचं. आता मविआच्या एकत्र सभा आणि उद्धव ठाकरेंच्याही स्वतंत्र सभा होतील, असं संजय राऊत म्हणाले.
या राज्याला मुख्यमंत्री नाहीत. या राज्याला मख्खमंत्री आहेत. मुख्यमंत्री असते तर राज्याची अशी अवस्था झाली नसती. सगळी सूत्र उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त ४० खोकेबाज आमदरांना एकत्र ठेवण्याचं काम करत आहेत. बाकी काही करत नाहीयेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
विरोधकांना ईडी, सीबीआय, इओडब्ल्यूच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जातंय. त्याच्यावर बोला. राहुल कुलचं मी ५०० कोटींचं प्रकरण दिलं आहे. त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतायत का? भाजपा आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्र्यांचे खासमखास आहेत. भीमा पाटणकर साखर कारखान्यातील ५०० कोटींच्या गौरव्यवहाराचं प्रकरण मी दिलं आहे. राहुल कुलला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री वाचवत आहेत. तुम्ही तुमच्या आसपास काय चाललंय ते पाहा आणि नंतर महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट दाखवा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे.