महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी तब्बल ९ महिन्यानंतर संपली
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर संपली आहे. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी तब्बल ९ महिन्यानंतर संपली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आता कुणीही युक्तीवाद करणार नाही. सुप्रिम कोर्टाचा निकाल जर ठाकरे गटाच्या बाजून लागला तर महाराष्ट्रात कदाचित मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावळीवेळी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात जस्टिस एमआर शाह यांचा समावेश आहे. त्यामुळे जस्टीस एकआर शाह यांच्या निवृत्ती आधी निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ते येत्या १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे हा निकाल १५ मे च्या आधी लागण्याची दाट शक्यता आहे.
आज सुप्रीम कोर्टात सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विचारलेल्या एका प्रश्नामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे.
आज सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या वकिलांकडून पूर्वस्थिती पुनर्स्थापित करून ठाकरे सरकार पुन्हा स्थापित करावे अशी विनंती कोर्टात करण्यात आली होती. त्यावर सरन्यायाधीशांनी तुम्ही सरकार पुनर्स्थापित करा असं म्हणत आहात. पण तुम्ही तर राजीनामा दिला आहे, असा सवाल केला.
त्यावर ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी त्या राजीनाम्याला काही उत्तर नाही, असं उत्तर दिलं. त्यावर सरन्यायाधीशांनी इथे ज्या सरकारने राजीनामा दिलाय, त्या सरकारला पुनर्स्थापित करण्याची मागणी केली जात आहे, अशी टिप्पणी केली.