‘..यामुळे भाजपवर हिंदू समाज नाराज’; आनंद दवेंची भाजपवर टीका
भाजपाचं हिंदूत्व कसं बेगडी आहे हे येत्या काही दिवसात दाखवू
पुणे : भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. राज्यात कसबा आणि चिंचवडची विधानसभा पोटनिवडणूची रणधुमाळी सुरू आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. आनंद दवे हे कसबा पोटनिवडणूक अपक्ष लढवत आहेत. त्यातच आता हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजपाने आमच्या प्रश्नांना केंव्हाही प्रतिसाद दिला नाही. भाजपाचं हिंदूत्व कसं बेगडी आहे, हे येत्या काही दिवसात दाखवून देऊ, असा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत बोहरी समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे ते म्हणाले की, मी जन्मत: बोहरी आहे. तसेच चार पिढ्या बोहरी समाजाशी नाते आहे. भाजपाला असं करावं लागत असल्याने हिंदू समाज नाराज झाला आहे, असं आनंद दवे म्हणाले आहेत.
आनंद दवेंनी यावेळी बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख करत. कसबा विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपाला जड जात आहे. त्यामुळेच भाजपला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रचारासाठी आणावे लागत आहे. कसबा मतदारसंघामध्ये खुल्या प्रवर्गातील 60 टक्के समाज आहे. हा सर्व समाज मला पाठिंबा देत आहे, असा दावा आनंद दवे यांनी केला आहे.
दरम्यान, कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीमध्ये काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी थांबविण्याचे आवाहन राजकीय पक्षांसमोर आहे. चिंचवडमध्ये शिवसेनेचे राहुल कलाटे तर कसब्यात आनंद दवे यांनी बंडखोरी केली आहे. दोन्ही पोटनिवडणूकांच मतदान येत्या 27 फेब्रुवारीला होत आहे. त्यातच आता कोण विजयश्री खेचून आणणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.