“शिवसेनेत दोन गट पडलेत हे खरं मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरें सोबतच”; शरद पवार
एकत्र निवडणूक लढण्यास महाविकास आघाडीला अडचण येणार नाही
मुंबई : आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट एकत्र तयारी करत आहोत. एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
सत्ता हातात असल्यावर जमिनीवर पाय ठेवून वागायचे असते. पण मी आता बघतो की, सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विधान याला तुरुंगात टाकेल, यांचा जामीन रद्द करेल वगैरे वगैरे अशी भाषा करत आहेत. हे खरं राजकीय लोकांचे काम नाही. परंतु या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली आहे, अशी टीका पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
मी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात फिरलो आहे. शिवसेनेत दोन गट पडले हे खरं आहे. मात्र कडवा शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरें सोबतच आहे. उद्या निवडणूक झाल्या की समाजाच्या त्यांच्याबद्दल भावना निश्चितच कळून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पवारांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले. महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते. ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही, असे पवार म्हणाले.