चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान… एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात!
मुंबई ः मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण लागलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून त्यांची जागा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आणि श्री संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नंदनवनमधील जगनाडे चौकात पार पडले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली.
सर्वच समाजाला न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्राचं सर्वोच मुख्यमंत्रिपद मिळालं पाहिजे अशी जबाबदारी आपल्यावर आहे, पुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल, तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रातील 18 पगड जातीचं ओबीसी आरक्षण गेलं होतं, ते परत मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दिलं. संताजी सभागृहाला जागा देणं, निधी देणं. संताजी महाराजांचा संपूर्ण इतिहास मांडला जाईल, त्यातून समाजाला दिशा मिळेल, असंही बावनकुळे म्हणाले.
संजय राऊत जेलमध्ये जाऊन बिघडले
शिवसेना खासदार संजय राऊत जेलमध्ये राहून थोडे बिघडले आहेत. उठून सूटून सकाळी उठले, आता महाराष्ट्र त्यांच्या बोलण्याला कंटाळला आहे, त्यामुळे त्यांनी हे बंद करावं. संजय राऊत सरकार गेल्यापासून वायफळ बडबड करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.