मुंबईतून चार बांगलादेशी नागरिकांना अटक
देशात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पोलिसांनी विविध कारवाईत अटक केली. सोहेल जलील शेख, मेहबूब अहमद शेख, मोहीन शादत खान आणि रिकन उत्तमकुमार चकमा अशी या चौघांची नावे आहेत. यातील रिकनने दिल्ली पारपत्र कार्यालयातून बनावट कागदपत्रांच्या मदतीने एक भारतीय पारपत्र मिळवून परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यात मेहबूब शेख आणि मोहीन खान या दोघांना अटक केली. चौकशीत ते दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. यातील मेहबूब हा जानेवारी २०१६ ला बांगलादेशातून भारतात आणि नंतर मुंबईत आला होता. नळ जोडणीचे काम करणारा मेहबूब हा माझगाव परिसरात राहात होता. त्याच्याकडून पोलिसांनी भारतीय आणि बांगलदेशी चलन जप्त केले आहेत. मोहीनकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून त्याच मोबाईलवरुन तो त्याच्या बांगलादेशातील कुटुंबियांसह नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. तो सध्या मिरारोड, भाईंदर परिसरात राहात होता. अन्य एका कारवाईत रिकन चकमा या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. तो विदेशात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या पारपत्राची पाहणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याने बनावट कागदपत्रे करुन दिल्ली पारपत्र कार्यालयातून ते पारपत्र मिळविले होते. याच पारपत्राद्वारे तो विदेशात नोकरीसाठी जाणार होता, मात्र त्यापूर्वीच त्याला इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.
अशाच एका कारवाईत देवनार पोलिसांनी सोहेल जलील शेख याला अटक केली. तो बांगलादेशी नागरिक असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता. आतापर्यंतच्या चौकशीत बांगलादेशातील गरीबी, उपासमारीला कंटाळून ते सर्वजण भारतात पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.