नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी मंत्रालयात ‘लोकशाही दिन’
मुंबई- नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने व्हावा यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 5 सप्टेंबर2018 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्र्यांसमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील संबधित अर्जदारांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष मांडण्याकरिता संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात संबंधित दिवशी प्रत्यक्ष उपस्थित रहावे. तसेच ज्यांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहे, त्या अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात प्रवेश देण्यात यावा, याबाबत संबधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. असेही सामान्य प्रशासन विभागातर्फे एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत अशा अर्जदारांनी दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित रहावे.