राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात; उदय सामंतांचा मोठा दावा
मुंबई ।
राज्यातील राजकीय सत्तांतरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेतील प्रतिष्ठेची लढाई सुरु झाली आहे. दरम्यान मूळ शिवसेनेतील एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. ज्यानंतर सातत्याने विरोधी पक्षांतील आमदारच शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहे. अशात राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदे गटातील नाराज आमदार सरकारमधून बाहेर पडतील असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्या विधानावर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
उदय सामंत म्हणाले की, आमच्याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अजित पवार चुकीचं बोलत असून उलट राष्ट्रवादी काँग्रेसचेच 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात आहेत.
आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित अजित पवार शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याचे वक्तव्य करत असतील. शिंदे गटातील आमदार नाराज आहेत किंवा नाराजी असल्यासारखं करतायत असं सांगण्यापेक्षा आपल्याकडील जे काही लोक मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत त्यांना थांबवण्यासाठी केलेली ही वक्तव्य आहेत असही उदय सामंत म्हणाले.