राजकारण ः गद्दाराला मुख्यमंत्री करण्यापेक्षा निवडणुका घ्या; राजस्थानात गहलोत गटाचा थेट हल्ला
जयपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष काही केल्या थांबताना दिसत नाहीय. अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता राज्यातील मुख्यमंत्री पदासंदर्भात जयपूर पासून दिल्ली पर्यंत बैठका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी मुख्यमंत्री गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. दोघांनीही या भेटीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्ष नेतृत्व करेल असे म्हटले होते.
दिल्लीतील या घडामोडीनंतर आता गहलोत गटात असलेल्या आमदार आणि मंत्र्यांनी पुन्हा एकदा मोठ्या बंडाची भाषा केली आहे. आधी परसादी लाल मीणा आणि आता कॅबिनेट मंत्री गोविंद राम मेघवाल यांनी थेट सचिन पायलट गटावर थेट हल्ला चढवला आहे. गद्दाराच्या गटातून नवा मुख्यमंत्री केला तर सामूहिक राजीनामे दिले जातील. मेघवाल यांनी मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे देखील म्हटले आहे.
कॅबिनेट मंत्री गोविंद राम मेघवाल यांनी जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, जर मुख्यमंत्रीपदासंदर्भात काही बदल झाले तर अशोक गहलोत यांच्यासाठी पक्षाचे सर्व आमदार राजीनामे देतील. ज्या पद्धतीने गेल्या रविवारी ९२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. जर पायलट गटातून मुख्यमंत्री निवडला तर अशीच परिस्थिती पाहाला मिळले.
गोविंद मेघवाल यांच्याआधी राज्याचे आरोग्यमंत्री परसादी लाल मीणा यांनी देखील काही दिवासांपूर्वी अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. अशोक गहलोत सरकारच्या विरोधात पायलट गटात बंड सुरू असल्याने पक्षातील कोणताही आमदार त्यांनी मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास तयार नाही. सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह जुलै २०२० मध्ये मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले होते. मीणा यांच्या वक्तव्यावर मेघवाल यांनी प्रतिक्रिया दिली, परसादी लाल एक वरिष्ठ नेते आहेत. ते विनाकारण कोणतेही वक्तव्य करणार नाहीत.
पायलट सारख्या गद्दाराला मुख्यमंत्री म्हणून कधीच स्विकारले जाऊ शकत नाही. फक्त सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अशोक गहलोत आमचे नेते आहेत. गहलोत गटातील मंत्र्यांकडून केल्या जाणाऱ्या अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे केंद्रीय नेतृत्वावर मुख्यमंत्री पदावर गहलोत यांनाच ठेवण्याचा एक दबाव असल्याचे बोलले जात आहे.
संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांनी मेघवाल यांच्या प्रमाणेच राज्याचे प्रभारी अजय माकन यांच्यावर पायलट यांची बाजू घेतल्याचा आरोप केलाय. माकन यांनी आमदार वेद प्रकाश सोलंकी यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही, जे एक कट्टर पायलट समर्थक आहेत. दरम्यान केंद्रीय नेतृत्वाने गहलोत आणि पायटल या दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करू नये असे बजावले आहे. जर असे झाले तर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय.