पोलीस, अग्निवीर भरतीसाठी तरुणांना सोयी-सुविधा पुरवा!; मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले आहेत.
देशसेवा करण्यासाठी पोलीस व अग्निवीर भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतो. त्यातील अनेक तरूण गरीब कुटुंबातील असतात. दूरवरून ते भरतीसाठी येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करण्याबरोबरच त्यांना नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख सरनाईक यांनी या पत्रात केला होता.