चंद्रपूर :यंदा विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान ; १८०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
चंद्रपूर : यंदा विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमधील नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आता पुन्हा वर्धा, वैनगंगा, उमा, इरई या नद्यांना महापूर आला असून चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना या पुराचा फटका बसला आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. पूरग्रस्त भागातील जवळपास १८०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
जिल्ह्यात अजूनही पाऊस कोसळत असल्याने इरई, अप्पर वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. वर्धा, वैनगंगा, इरई या नद्या ओसंडून वाहत आहेत. परिणामी नदीकाठी असणाऱ्या माजरी, बेलसनी या गावामध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले. पूरग्रस्त भागात सुरू असलेलं बचावकार्य अजूनही कायम असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रस्ते बंद, नागरिक अडकले, पिकेही बुडाली; काय आहे जिल्ह्यातील स्थिती?
संततधार पावसामुळे आधीच नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिरणा, मूल तालुक्यातील ताडाव कोराडी आणि वर्धा नदीला पूर आला. त्यामुळे माजरीसह परिसरातील गावांना पुराचा विळखा बसला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या, शेतातील बांधावर अडकून असलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
पुरामुळे चंद्रपूर-वणी मार्ग बंद झाला आहे. बामणी येथील वर्धा नदीच्या पुलावर पाणी वाढल्याने बल्लारपूर राजुरा- हैदराबाद मार्ग बंद आहे. तसंच महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पूल पाण्याखाली गेला आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं असताना पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचंही नुकसान झालं आहे.