बंडखोरांनी पुढच्या २४ तासांत मुंबईत यावं, शिवसेना आघाडीतून बाहेर पडायला तयार : संजय राऊत
![Rebels should come to Mumbai in next 24 hours, ready to quit Shiv Sena alliance: Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Sanjay-Raut123.jpg)
मुंबई : ठतुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल”, असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. “मोबाईलवरुन, व्हॉट्सअॅपवरुन तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मांडा, तुमच्या मागण्यांचा उद्धव ठाकरे नक्की विचार करतील, फक्त पुढच्या २४ तासांत मुंबईत या”, असा मेसेज संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातून निसटलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत आमदार पाटील आणि आमदार देशमुखांनी सुटकेचा थरार सांगितल्यावर संजय राऊत यांनी पुढच्या दोन मिनिटांत राज्याचं राजकारण बदलणारं २ मोठी वक्तव्ये केली.
संजय राऊत काय म्हणाले?
जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्याबाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल तर महाविकासआघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे, त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. पण त्यांनी मुंबईत येऊन ही मागणी मांडावी. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही २४ तासांत परत या. तुमच्या मागणीचा उद्धव ठाकरे विचार करतील. हे मी जबाबदारीने सांगत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊत यांचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्ही शेवटपर्यंत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहू, अशी भाषा केली जात आहे. मात्र, त्याचवेळी आता शिवसेना मात्र महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवित असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.