पटोले आणि थोरात पुणतांब्यात शेतकऱ्यांना भेटले, मागण्यासंबंधी केंद्राकडे बोट
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज पुणतांबा येथे जाऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यासंबंधी चर्चा करताना शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला केंद्र सरकारचा जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. करोनामुळे अडचणी येत असल्याचे गाऱ्हाणेही त्यांनी सांगितले. मात्र, यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. आंदोलनावर ते ठाम राहिले. पुणतांबा येथील शेतकरी आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. तर शिर्डीत काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचाही दुसरा दिवस होता. काँग्रेसचे नेते त्यासाठी कालपासूनच आलेले आहेत. आज दुपारी पटोले आणि थोरात यांनी पुणतांब्याला येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मागण्यांवर चर्चा केली. सरपंच डॉ. धनंजय धनवटे आणि ग्रामस्थांनी त्यांना मागण्यांची माहिती दिली.
यावर बोलताना पटोले म्हणाले, ‘शेतकऱ्यांचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे शिबीर सोडून आम्ही येथे आलो आहोत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर ठराव होतात. मात्र प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत आङे. गेल्या काही काळात अडीच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले. तेव्हा केंद्र सरकाराने त्याकडे सुरवातील लक्ष दिले नाही. उलट त्या शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटले. मी पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदारकी सोडली आहे’, याची आठवणही पटोले यांनी करून दिली.
थोरात म्हणाले, ‘आंदोलने होतच असतात मात्र त्यांच्याशी बोलणे संवाद साधने हे आमचे कर्तव्य आहे. येथे आम्ही शेतकरी म्हणून आलो आहोत. काँग्रेसच्या राष्ट्रीय शिबिरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. येथे शिर्डीतही अशी चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा देण्याचा आम्ही शब्द दिला. सुरवातीला दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली. इतरांनाही ती द्यायची आहे. मात्र करोनामुळे सगळे थांबले. करोना काळात सरकारने शेतकऱ्यांकडून दहा लाख लीटर दूध विकत घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला. उसाप्रमाणे दुधाला भाव देण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र केंद्राने गहू व कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे,’ असे सांगून थोरात यांनीही केंद्र सरकारकडे बोट दाखविले. दरम्यान, शेतकरी नेते पाशा पटेल यांनीही आज पुणतांब्यात येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. शेतीमालाच्या पडत्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनस्थळी फळे आणि भाजीपाला मोफत वाटण्यात आला.