पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या सरपंचाला बेदम मारहाण; खोटे गुन्हेही दाखल
बीड : गावच्या पाणी पुरवठा विहिरीच्या शेजारीच एका व्यक्तीने खाजगी विहीर खोदून पाणी पळवल्याच्या घटनेनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नाही, तर पीडित सरपंचाच्या विरोधात खोटे गुन्हेही दाखल करण्यात आले. यामुळे ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले आहेत. त्यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या केला. गावात पाणी मिळत नाही आणि पाणी देणाऱ्या सरपंचाला पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने कायद्याचा दुरुपयोग केला आहे. पोलीस अधिकारी अव्वाच्यासव्वा पैसे मागून लोकांची लूट करत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून त्याची चौकशी करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.
बीडच्या दिंद्रुड गावात पाणीपुरवठा योजनेच्या शेजारी एका खाजगी व्यक्तीने विहीर खोदली. यासंदर्भात सरपंचांनी तक्रार केली. यावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी स्पॉट पंचनामा केल्यानंतर विहिरीचे बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले. त्याचा राग धरून वेळी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची तोडलेली विद्युत जोडणी जोडण्यासाठी गेलेल्या सरपंचाला चार ते पाच व्यक्तींनी मारहाण केली. गट सरपंचाच्या विरोधात पोलीस प्रशासनाला हाताशी धरून खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकाराविरोधात गावातील महिला, पुरुष सामान्य नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या केला. यावेळी माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आले. तसेच त्यांच्याशी चर्चा करून खोटे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन आमदारांना दिले.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी प्रयत्न करत असल्यानेच सरपंचांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवले आहे, असे सांगत त्यांच्यावर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. या अगोदर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्षवेधी करत विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील दिंद्रुड गावातील सरपंचांच्या विरोधात खोटे गंभीर गुन्हे दाखल केल्याच्या विरोधात पुन्हा एकदा आमदार सोळंके सक्रिय झाले असून पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.