मराठा आरक्षणासाठी खासदार, आमदारांनी राजीनामे द्यावेत – मारुती भापकर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – सकल मराठा समाजाच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी स्वत:हून राजीनामे द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.
भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, सकल मराठा समाजाच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी मराठा मुक क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण या मुख्य मागणी सह विविध मागण्या घेऊन महाराष्ट्र राज्यात अतिशय शिस्त बद्ध व सनदशील मार्गाने लाखोंचे ५८ मोर्चे काढण्यात आले. परंतु महाराष्ट्र सरकारने षडयंत्र पूर्वक जाणूनबुजून वेळकाढूपनाची भूमिका घेऊन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण अडकविले त्यामुळे शांत व संयमी असणारा मराठा समाज आक्रमक होऊन मुक मोर्च्याचे रुपांतर ठोक मोर्चात होऊन आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली.
या मराठा आंदोलनातील औरंगाबाद येथील कार्यकर्ते काका साहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत जलसमाधीचा इशारा देऊन आंदोलन केले. या आंदोलनाबाबत सरकारी यंत्रणेने अक्षम्य असे दुर्लक्ष केल्यामुळे काकासाहेब शिंदे या तरुण कार्यकर्त्याचा बळी गेला. ते समाजाच्या हितासाठी शहीद झाले. तसेच याच आंदोलनाचे एक कार्यकर्ते जगन्नाथ सोनवणे यांनी हि विष प्राशन करून आपल्या प्राणांची आहूती दिली.
त्यानंतर सकल मराठा समाज आक्रमक होऊन संपूर्ण महाराष्ट्रात आगडोंब उसळला या विषया संदर्भात समाजमन अत्यंत संवेदनशील झालेले आहे. याची दखल घेऊन कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, शिवसेनेचे हेमंत पाटील, राहुल मोटे व कोंग्रेसचे भारत भालके यांनी समाजासाठी पुढे येऊन स्वत:च्या आमदारकीचे राजीनामे दिले आहे.
त्यामुळे सकल मराठा समाज्याच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी स्वत:हून राजीनामे द्यावेत जर खासदार व आमदार यांनी समाजासाठी अशी कृती केली तर राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री समाजाच्या मागण्यांबाबत कृतीशील होतील व विधानसभा व संसदेच्या आयुधांचा तत्परतेने उपयोग करून समाजाला न्याय देण्याबाबत सकारात्मक पाऊले टाकतील त्यामुळे मराठा आमदार व खासदारांनी राजीनामे दिले तर समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्या शिवाय राहणार नाही असे भापकर यांनी पत्रकात म्हटले आहे.