खोट्या विकासाच्या आशा दाखवून पुणेकरांच्या जीवाशी खेळ करू नये – शरद पवार
पिंपरी चिंचवड | खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी मोठमोठी धरणे पुण्याच्या वरच्या भागात असतांना नदीचे पात्र कमी करणे हे भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे द्योतक ठरू शकते. पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्याचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला होता. अनेक संसार उद्धवस्त झाले, अनेक पुणेकर देशोधडीला लागले. असे असतांना अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या नदीसुधार प्रकल्पाचे भविष्य काय ठरू शकते, असा थेट सवाल ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज विचारला.
पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे माळवाडी येथे उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या आधुनिक आणी सुसज्ज अशा कै. सुभद्रा प्रभाकर बराटे मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा खासदार आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अभ्युदय बराटे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर प्रशांत जगताप, पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी आमदार कुमार गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ही वास्तू उभारण्यात मोलाचे सहकार्य करणा-या महानरपालिकेच्या पदाधिका-यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशात कोरोनासारखे मोठे महासंकट नुकतेच येऊन गेल्यानंतर सर्वसामान्यांचा आर्थिक ताळेबंद कोलमडला आहे. विस्कळीत झाला आहे. अनेकांच्या नोक-या गेल्या, अनेकांचे व्यापार बुडाले, अनेकांना विविध स्तरावर आर्थिक झळ सहन करावी लागते आहे. कोरोनासारख्या महाकाय संकटातून आपण नुकतेच कसेबसे बाहेर पडत असतांना जगावर तिस-या महायुद्धाचे सावट घोंघावत आहे. इंधनाचे दर युद्धामुळे गगनाला भिडत आहेत. शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. युक्रेनमध्ये मेडीकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्यार्थ्यांबाबत देशाच्या नेतृत्वाने अधिक तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
संकटग्रस्त विद्यार्थी, परराष्ट्र खाते आणि सरकार यांच्या समन्वयाचा अभाव दिसून येत असून याचा थेट फटका विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बसत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी ज्या उपाययोजना विद्यार्थ्यांना सुचवल्या जात आहेत, त्या प्रत्यक्षात अंमलात आणणे विद्यार्थ्यांना शक्य होत नाहीये. रशियाकडून सासत्याने होत असलेला गोळीबार, हल्ले आणि प्रचंड थंडीमुळे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. मी काही विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता तिथली परिस्थिती चिंताजनक आहे.
पुण्याचा चेहरा-मोहरा प्रचंड वेगाने बदलत आहे. वारजे परिसर हा सुप्रियाचा मतदारसंघ येतो. येथे 25-30 वर्षांपूर्वी शेती, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सरपंच अशी स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना होती. परंतू, विस्तारलेल्या पुणे शहरामुळे ही परिस्थिती बदलली. आज पुण्यासारख्या शहरात महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोप-यातून नानाविविध संस्कृती, भाषा आणि अस्मिता घेऊन लोक स्थलांतरीत होत आहेत.
नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय आकसापोटी झालेली आहे. गेल्या 20 वर्षांपासून नवाब मलिक प्रतिनिधीत्व करीत असतांना हे प्रकरण आणि ही कारवाई पुढे येण्यामागे केवळ राजकीय आकस आहे. पंतप्रधानांनी विकासकामांची उद्घाटने करावी, परंतू आधी युक्रेनमध्ये अडकलेले निष्पाप विद्यार्थी भारतात सुखरूप येतील, यादृष्टीने कार्यवाही करावी.