पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले- स्मृती इराणी
नवी दिल्ली |
पंजाबमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियोजित रॅली रद्द झाली असून, यावरून सध्या राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रूट राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे. काही आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान मोदी १५ ते २० मिनिटं एका उड्डाणपूलावरच अडकले होते. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची कल्पना असताना आणि पंजाब पोलिसांकडून सुरक्षेचं आश्वासन दिलेलं असतानाही इतकी मोठी घोडचूक झाल्याने आता भाजपाकडून पंजाब सरकार व काँग्रेसवर संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकारपरिषद घेत, या प्रकारावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, “भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी इरादे अयशस्वी ठरले. काँग्रेसमधील जे लोक मोदींचा द्वेष करतात, ते आज देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते.”
तसेच, “जो आक्रोश तुम्ही माझ्यामध्ये आणि सुधांशू यांच्यात पाहात आहात. तो केवळ आमच्या राजकीय संघटनेपुरता मर्यादित नाही. आम्ही वारंवार सांगितलं. काँग्रेसला मोदींचा तिरस्कार आहे, हिशोब भारताशी आणि भारताच्या पंतप्रधानांशी करू नका. पंजाब सरकारला काँग्रेसला आज उत्तर द्यावं लागेल. पंतप्रधान कोणत्या मार्गाने एका ठिकाणी पोहचतात, त्या संपूर्ण मार्गाच्या सुरक्षेची व्यवस्था आणि कोणतीही अडचण नाही असे आश्वासन पंजाब पोलिसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षा दलाला दिले होते. मग, जाणूनबुजून पंतप्रधानांच्या सुरक्षा दलास खोटं बोललं गेलं का? पंतप्रधानांच्या संपूर्ण ताफ्याला जेव्हा अडवण्याचा प्रयत्न झाला, २० मिनिटांपर्यंत जेव्हा त्यांची सुरक्षा भंग केली गेली. ज्या लोकांनी पंतप्रधांनांची सुरक्षा भंग केली. त्या लोकांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत त्या ठिकाणापर्यंत कोणी आणि कसं पोहचलवंल?” असे प्रश्न देखील इराणी यांनी यावेळी उपस्थित केले.
LIVE: Smt. @smritiirani addresses a press conference at party headquarters in New Delhi.
https://t.co/LvVczMqgc2— BJP (@BJP4India) January 5, 2022
नेमकं काय झालं…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल २ तासांचा होता.