चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात, त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका- जयंत पाटील
![Chandrakantdada speaks even in his sleep these days, don't take his words to heart - Jayant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/jayant_patil.png)
रत्नागिरी |
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात, असे कानावर आले आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने मंत्री पाटील गणपतीपुळे येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेबाबत विचारले असता त्यांना इतके महत्त्व देणे जरुरीचे नाही, अशीही टिप्पणी जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नबाब मलिक आणि ज्येष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील वादाबाबत ते म्हणाले की, भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मलिक माहिती उघड करत आहेत. त्याला वानखेडे उत्तर देतील. मात्र वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान यांच्या कारवाईतील मलिक यांनी दिलेल्या माहितीत सर्व काही उघड झाले आहे. यात वानखेडे आणि मलिक आपापली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील. यामध्ये पडून भाजपाने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही.
भारतात १३५ कोटी लोकसंख्या असतानाही केंद्रीय यंत्रणेला केवळ महाराष्ट्रातील आणि त्यांच्याविरोधी बोलणारे त्यातही केवळ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेते दिसत आहेत. बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील खासदारच सांगतात की, आता आम्हाला रात्रीची शांत झोप लागते. म्हणजेच भाजपात तुम्ही गेलात की सगळ्याला अभय आहे. परंतु विरोधात आवाज उठवला की त्यांची दहा—वीस वर्षांपूर्वीचे कागद काढायचे आणि चौकशीचा ससेमिरा सुरु करायचा, धाड टाकायची, त्यांची बदनामी करण्याचे काम केंद्रीय यंत्रणेने करावे, हे दुर्दैव आहे, असेही मत पाटील यांनी नोंदवले.