पावसाच्या तांडवाने मानसरोवर यात्रेत विघ्न
- नेपाळमध्ये 1500 भारतीय यात्रेकरु अडकले
काठमांडू – कैलास मानसरोवर यात्रेवर निघालेले 1500हून अधिक भारतीय नागरिक मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या यात्रेकरूंच्या यादीनुसार, भारतातून गेलेले 525 यात्रेकरू सिमीकोट इथे, 550 हिल्सा इथे तर तिबेटच्या मार्गावर 500 यात्रेकरू अडकले आहेत.
तर 104 यात्रेकरूंना आतापर्यंत वाचवण्यात यश आलं आहे. मात्र आंध्र प्रदेशच्या एका यात्रेकरूचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या यात्रेकरूचा मृतदेह हाती लागला असून शवविच्छेदनानंतर त्यांचं पार्थिव त्याच्या गावी रवाना करण्यात येईल. नेपालगंज, सिमीकोट आणि हिल्सा या भागातील परिस्थितीवर भारतीय दूतावास लक्ष ठेवून आहे. मंगळवारी सकाळी वातावरण खराब झाले होते.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. भारतीय दूतावासाने नेपालगंज आणि सिमीकोटमध्ये आपले प्रतिनिधी तैनात केले आहेत. बचाव पथकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यात्रेकरूंच्या भोजन आणि राहण्याची व्यवस्था प्रशासनानं केली आहे. तर नेपाळमध्ये भारतीय दूतावासाने यात्रेकरू व त्यांच्या नातेवाईकांसाठी विविध भाषांमधून हॉटलाईन सेवा सुरू केली आहे. तसेच नेपाळमध्ये नागरिक व वैद्यकीय सेवा पुरेशा नसल्याने यात्रेकरूंना तिबेटमध्येच थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जीप नदीत कोसळल्याने 6 भारतीय ठार
नेपाळमध्ये एक जीप नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना भारताच्या सीमेजवळ नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यात घडली. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या अपघातात जीप चालकासह इतर चार लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
सर्व प्रवासी हे धनकुटा जिल्ह्यातील भेडेटार हिल स्थानकावर परतत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जीप नदीत कोसळल्यानंतर तीन लोकांचा जागीच तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलीस अधिक्षक रमेशकुमार लमसाल म्हणाले की, नदीतून जीपला बाहेर काढताना तीन मतृदेह सापडले. जीपमध्ये प्रवास करणारे सर्व भारतीय हे बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. नेपाळ पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त जीपवर भारतीय नंबर प्लेट होती. ही जीप कोसी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे सध्या नदी ओसंडून वाहत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.