औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा! – मनसे
औरंगाबाद | ‘औरंगाबाद’ की ‘संभाजीनगर’ या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उडी घेणार आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी मनसेने केली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील शहराच्या नामांतराची मागणी विधानसभेत करणार आहेत.
‘औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आमदार राजू पाटील विधानसभेत तसा प्रस्ताव मांडतील’, अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ‘एका मराठी वृत्त वाहिनीला’ दिली आहे.
हिंदूत्ववादी भूमिकेकडे झुकलेल्या मनसेने शिवसेनेची भूमिकाही हायजॅक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचे दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी राजू पाटील आणि अभिजित पानसे औरंगाबाद शहरात कालच दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.





