“संजय राऊत हे कागदावरचे नेते”; सामनामधील विरोधी पक्षावरील टीकेवरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुंबई |
गुलाब चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन त्याचा फटका महाराष्ट्राच्या अनेक भागांना बसला आहे. मराठवाड्यामध्ये लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या पावसामुळे नुकसान झालेल्या भेट देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नांदेडमधील चिवली आणि फुलवाल गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी अतिवृष्टी आणि पूर अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. सत्य परिस्थिती सरकारला समजावी आणि जेथे कमतरता आहे, तेथे त्या गोष्टींची पूर्तता व्हावी, यासाठी हा दौरा काढण्यात आला आहे असे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. त्यानंतर आता संकटग्रस्त लोक अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात,’ असा खोचक टोला शिवसेनेने सामनामधून विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची माहिती घेत फडणवीस प्रत्यक्ष शेतीची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. “जे ऑफिसमध्ये बसून टीका, राजकारण करतात त्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती समजूच शकत नाही. त्यांनी कधी शेतकऱ्यांना जाऊन भेट दिली नाही, त्यांचे अश्रू पुसले नाहीत. इथे येऊन अश्रू पाहिले असते ना तर अशा प्रकारचे बोलायचे त्यांची हिंम्मत झाली नसती. त्यामुळे अशा लोकांना का उत्तर द्यायचं? हे कागदावरचे नेते आहेत. हे अग्रलेख लिहून नेते झालेले लोक आहेत त्यामुळे त्यांना काही मी उत्तर देत नाही,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
- सामनामध्ये नक्की काय म्हटलंय?
विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत श्री. मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे. कारण मराठवाडय़ातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱ्या फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर ‘व्हाया ओला दुष्काळ’ राजकारण, असाच झाला म्हणायचा अशी टीका शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे.