भाजप, संघ परिवाराच्या द्वेषाला प्रेमाने उत्तर द्या
राहुल गांधी यांचा कार्यकर्त्यांना मंत्र
देशामध्ये सध्या सुरू असलेली लढाई विचारसरणीची आहे, एकीकडे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वेष पसरवत असला तरी त्यांच्या द्वेषभावनेला आपण द्वेषाने उत्तर देऊ शकत नाही, आपल्याला प्रेमाने त्याचे उत्तर द्यावयाचे आहे, असा मंत्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे कार्यकर्त्यांना दिला.
राजस्थानमधील अजमेर येथे सेवादलाच्या मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते. नागरिकत्वाच्या विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये निर्माण झालेल्या तणावाचा संदर्भ देऊन गांधी यांनी भाजप आणि संघ परिवारावर हल्ला चढविला.
भाजपने ईशान्य भारताला तणावामध्ये लोटले आहे, मात्र हे प्रदेश आम्हाला प्रेमानेजिंकावयाचे आहेत, आम्हाला नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे, सेवादलाची ताकद वाढवावयाची आहे, द्वेषाने द्वेष जिंकता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यावर, आपल्या कुटुंबीयांवर, काँग्रेस पक्षावर सातत्याने टीका करतात, मात्र हे विसरून आपण त्यांना संसदेत मिठी मारली, आपल्या कृतीने त्यांच्या मनातील द्वेषावर मात केली, असे राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदी १५-२० लोकांच्या निवडक गटासाठी देश चालवितात, मोदी यांच्यासाठी भारत हे एक उत्पादन आहे आणि त्याचा लाभ मोदी यांना केवळ १५-२० जणांमध्येच विभागण्याची इच्छा आहे, मात्र काँग्रेस हा एक सागर आहे, प्रेम हाच या देशाचा मूळ स्वभाव आहे, द्वेष येथे फार काळ टिकत नाही आणि या देशामध्ये कोणालाही घाबरण्याची गरज नाही, असेही गांधी म्हणाले.
देशामध्ये गेल्या ७० वर्षांत काहीच झाले नाही अशी टीका मोदी करतात, हा म. गांधीजी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, शेतकरी, कामगार आणि देशातील जनतेचा, प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे, असेही ते म्हणाले.