दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डींविरोधातील गुन्हा रद्द; उच्च न्यायालयाचा निर्णय
पुणे |
मेळघाटमध्ये २५ मार्च रोजी वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच, क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांचं देखील नाव या चिठ्ठीमध्ये होतं. मात्र, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द ठरवला आहे. तसेच, सुनावणी सुरू असलेलं हे प्रकरण देखील बंद केलं आहे. त्यामुळे दीपाली चव्हाण यांच्यासाठी लढा देणारे त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयानं गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
दीपाली चव्हाण या हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्तीवर होत्या. लेडी सिंघम म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. डिंक तस्करांचा पाठलाग करताना दीपाली चव्हाण दुचाकीवर थेट मध्य प्रदेशपर्यंत त्यांचा पाठलाग करत गेल्याचा किस्सा देखील अधिकारी आणि कर्मचारी अभिमानाने सांगतात. पण २५ मार्च रोजी आपल्या सरकारी निवासस्थानी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी ४ पानांची सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावं देखील त्यांनी नमूद केली होती. श्रीनिवास रेड्डी हे त्यापैकीच एक अधिकारी आहेत.