कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण…
पुणे |
महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं होतं. दौऱ्यासाठी आलो असताना एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांना संताप व्यक्त केला होता. आधी फोनवरुन आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता. दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
“दौरे फिरण्यासाठी केलेले नाहीत. त्यांनीही करु नयेत. आम्ही पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो. लोकांचं नुकसान झालं आहे. त्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणं, दाखवणं आमचं काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात तिथे अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी जाहीर केली,” असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे.
- नारायण राणेंवर अजित पवारांची नाराजी
“जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मधे आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंचं नाव न घेतला गुरुवारी नाराजी जाहीर केली. “अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,” असंही यावेळी ते म्हणाले.