महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात
सिंधुदुर्ग – महाराष्ट्रात रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक संचारबंदीचे आदेश लागू केले होते. या आदेशांना मुदतवाढ देत आता 15 मे पर्यंत हे आदेश महाराष्ट्रात लागू करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर बनत चालली असताना अनेक जिल्ह्यातील पालकमंत्री आणि प्रशासनाने मिळून जिल्ह्यात जनता कर्फ्यू तसेच कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले आहेत.
रविवार पासून या कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून 15 मे पर्यंत कडक निर्बंध संपूर्ण जिल्हाभरात लागू असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा मालाचे दुकान उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. पण नागरिकांना दुकानावर जाऊन खरेदी करता येणार नाही.
किराणा मालाच्या दुकानदारांना सकाळी 7 ते 11 या वेळेत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देता येणार आहे. याशिवाय शेतीची कामंही सुरू राहतील. पण इतर कोणत्याही कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. विनाकारण नागरिक घराच्या बाहेर पडल्यास आणि निर्बंधांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं दिसून आल्यानंतर कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार 9 मे ते 15 मे पर्यंत हा लाॅकडाऊन संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असणार असून या लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होऊन रुग्ण संख्या कमी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.