मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर
नवी मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात २०१४ साली वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यावरून त्यांच्याविरोधात सतत समन्स काढून त्यांना कोर्टात राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, राज ठाकरे स्वत: कोर्टात हजर झाले. त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
राज ठाकरे आज बेलापूर कोर्टात हजर राहणार होते त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनरबाजी करण्यात आली. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात होणार असल्याने मनसेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आयती संधी चालून आली आहे.
वाचा :-उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहांना दिले जाणार ‘मातोश्री’ नाव – उदय सामंत
काय आहे प्रकरण?
26 जानेवारी 2014 रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मनसेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. टोलनाक्यावरून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा टाकला जात असून यांना अद्दल घटवा असे वक्तव्य केले होते. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुढील काही वेळातच वाशी खाडी पुलावरील टोलनाक्यावर नवी मुंबईतील मनसेने कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळेंसह एकूण 7 जणांवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली असली तरी राज ठाकरे यांनी मात्र पोलिसांच्या नोटीसींना उत्तरे दिली नव्हती. वाशी पोलिसांकडून अनेक वेळा राज ठाकरे यांना समन्स धाडूनही ते न्यायालयासमोर हजर झाले नव्हते. ही बाब पोलिसांनी वाशी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर अखेर त्यांच्या विरोधात कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने राज ठाकरे यांना दिले होते.