अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात वापरला मोबाईल, दोन पोलीस निलंबित
मुंबई – वास्तूविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी तुरुंगात मोबाईल वापरत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आलं आहे.
अर्णब गोस्वामीसह दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार अर्णबसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग शहरातील नगरपरिषद एक नंबर शाळेत कैद्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटर जेलमध्ये ठेवण्यात आले होते.
यावेळी 6 नोव्हेंबरला अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी मोबाईल दिल्याची घटना घडली होती. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईत दोन तुरुंग पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
04 नोव्हेंबर रोजी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अलिबागला नेण्यात आले होते. अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, गोस्वामी यांच्या विरुद्ध अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनीही FIR दाखल केला आहे. पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामींवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे असे आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.





