सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या २२५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई – राज्यात अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया राबवताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पूर्ववत करण्यात येतेय. यामध्ये एसटी, बेस्ट आणि रेल्वे सेवा सुरू असून येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. यामध्ये २२५ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात एसटी-बेस्टच्या ७८, तर रेल्वेच्या १७७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
एसटीच्या १,४२३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५११ कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून ८६९ कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाने आतापर्यंत ४३ कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. कर्मचारी प्रत्यक्षात कामावर असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. पाच पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव एसटी महामंडळाकडे सादर झाले आहेत. याशिवाय कोरोनामुळे मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना पात्रतेनुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरीही दिली जाणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेतही बाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतील रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्त कर्मचारी व कु टुंब सदस्यही आहेत. आतापर्यंत १,८०० जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. १६० जणांवर उपचार सुरू आहेत.
बेस्टच्या ३५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
बेस्टचे आतापर्यंत २००५ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले, तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक १,३४७ कर्मचारी बेस्टच्या परिवहन सेवेतील असून विद्युत पुरवठामधील ३१४, अभियंता विभागातील २४४ आहेत. एप्रिल महिन्यात बेस्टच्या ४० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर मे महिन्यात ३२१, जूनमध्ये ३४३, जुलैमध्ये ७८३ कोरोनाबाधित कर्मचारी आढळले. नंतर या संख्येत घट होत गेली आणि ऑगस्ट महिन्यात ४६५ तर सप्टेंबर महिन्यात ३०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली.