कोरोना काळात लिक्विड ऑक्सिजनची टंचाई, उल्हासनगर ते बदलापूरपर्यंत सर्वत्र तुटवडा
बदलापूर | देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यादरम्यान आता अचानकपणे लिक्विड ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा भासू लागला आहे. तुटवडा भासू लागल्यामुळे या फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे.
मुंबईलगतच्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात सध्या लिक्विड ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. या भागातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्णांवर उपचार करणं शक्य नसून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात आहे. बदलापूरच्या बॅरेज रोड परिसरातील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये तर भीषण परिस्थिती असून केवळ संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन उपलब्ध आहे.
हा ऑक्सिजन संपला आणि एका मिनीटासाठी जरी हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा बंद झाला, तर गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. त्यामुळे इथे दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं जात आहे. पण त्यासाठीही रुग्णांना बेड मिळण्यात वेळ जात आहे. याशिवाय दुसरीकडेही ऑक्सिजन नसला तर रुग्णांच्या डोळ्यादेखत मृत्यू होताना पाहण्याखेरीज डॉक्टरांकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही.
हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढल्यानं औद्योगिक क्षेत्राला पुरवला जाणारा ऑक्सिजन पुरवठा कमी करण्याची मागणी आता केली जात आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत डॉक्टरांनानीही हतबलता व्यक्त केली आहे.





