मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचे फोन आले आहेत. तर अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणी भाष्य केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या तीन प्रमुख नेत्यांना धमकीचे फोन आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्याचे काल समोर आले होते. आता, शरद पवार यांनाही काल भारताबाहेरुन धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. तर कंगना रनौतविषयी टिप्पणी केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दुबईवरुन शनिवारी रात्री 2 वाजता मातोश्रीवर फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचं सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल ऑपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. सध्या याबाबतची चौकशी सुरु आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आंतरराष्ट्रीय कॉल आल्याने हे प्रकरण गंभीर आहे. आमचा मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास आहे, ते त्यांच्या सुरक्षेची कामगिरी चोख बजावतील. पण आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने तो कुठल्या दहशतवादी टोळीशी संबंधित आहे का, याचाही तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे NIA तपासाची मागणी करत आहोत.” असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले.