आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी
नवी दिल्ली । महाईन्यूज । वृत्तसंस्था ।
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळतोय. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत या यात्रेचा प्रवास असणार आहे. राजकारणासह सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या यात्रेत सहभाग घेतला. यात आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन देखील आज भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्याशी अनेक तास चर्चा केली. रघुराम राजन सातत्याने आर्थिक मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडतात.
रघुराम राजन हे कठोर शिस्तीचे आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मनमोहन सिंग यांच्या काळात ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. केंद्रातील सत्तांतरानंतर राजन हे देखील गव्हर्नर पदावरून पायउतार झाले होते. यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. मोदी सरकारच्या काळातील नोटाबंदीच्या निर्णयानंतर राजन यांनी टीकास्त्र डागले.
आज सकाळी राजस्थानमधील सवाई माधोपूर इथे ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. यावेळी काही वेळ राहुल गांधी यांच्यासोबत चालत संवादही साधला. काँग्रेसने याबाबत ट्विट केले आहे. द्वेषभावनेच्या विरोधात उभे राहून देश जोडण्यासाठी पुढे येत असलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. आम्ही यशस्वी होणारच, हे दाखवून देणार हे चित्र आहे, असं काँग्रेसने म्हटले आहे.
यापूर्वी विविध राज्यांतून प्रवास करताना राहुल गांधींच्या या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, कम्प्युटर बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले अध्यात्मिक गुरू नामदेव दास त्यागी, अभिनेत्री स्वरा भास्कर, प्रकाश राज, पूजा भट्ट, अमोल पालेकर आणि बॉक्सर विजेंदर सिंग सहभागी झाले.