अनलॉकमुळे मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
मुंबई – मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली होती. मात्र, शहर अनलॉक केल्यानंतर रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई पालिकेची चिंता वाढली आहे.
हजार ते बाराशेच्या घरात नव्या रुग्णांची नोंद होत होती. तसेच, ऑगस्ट महिन्यात हा आकडा एक हजाराच्याही खाली गेला होता. मात्र, आता पुन्हा दीड हजाराहून अधिक नवे रुग्ण मुंबईत सापडत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी 18 हजारांच्या घरात असलेले सक्रिय रुग्ण सध्या 22 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि अनलॉकची सुरु झालेली प्रक्रिया हे पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत स्थिरावलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आणि राज्य शासनासमोर पुन्हा एकदा आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णनोंद वाढत आहे. 4 सप्टेंबर रोजी 22 हजार 220 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापूर्वी, 3 सप्टेंबर रोजी 21 हजार 442, 2 सप्टेंबर रोजी 20 हजार 813 , 1 सप्टेंबर रोजी 20 हजार 65 आणि 31 ऑगस्ट रोजी ही संख्या 20 हजार 554 इतकी होती (COVID-19 Cases Increases In Mumbai).
शहर उपनगरात शुक्रवारी 1929, गुरुवारी 1526, बुधवारी 1622, मंगळारी 1142 इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 3 ऑगस्ट रोजी मुंबईत अवघे 705 रुग्ण आढळले होते. परंतु, सप्टेंबरमध्ये ही संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे.
खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वाढली आहे. शिवाय, अनलॉकमुळे प्रवास, वाहतूक वाढल्याने रुग्णसंख्येचा आलेख चढता दिसून येतो आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.