दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी राजू शेट्टींच गायींसोबत आंदोलन
राज्यात सध्या दुधाला किंमत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहे. दुधाला योग्य तो भाव मिळाला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी वारंवार आंदोलनाचा पवित्रा हाती घेत आहेत. आज साताऱ्यात त्यांनी गायीला सोबत घेत हे आंदोलन केले. साताऱ्यातील बॉम्बे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला होता. सध्या शासकीय दर जो दुधाला मिळत आहे तो परवडत नाही आहे. त्यामूळे सरकारने हा दर वाढवून द्यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
“आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. लॉकडाऊन, संचारबंदी आम्हाला माहित अजूनही आम्ही सविनय कायदेभंगाच्या अनुसार हे आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्स कशासाठी पाळायचे. गावात राहून लिटरला १५ टक्के कोटा सहन करुन कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाच्या महामारित एकदा काय तो निर्णय लागू देत, या त्यागाने जीवाची पर्वा न करता शेतकरी रस्त्यावर उतरला आहे”, असे राजू शेट्टी म्हणाले.
“ केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामूळे मिठाई, आईस्क्रीम पार्लर, हॉटेल बंद झाल्याने दुधाचा ४० टक्के खप कमी झाला. त्यातून दुध अतिरिक्त होऊन भाव पडले आहेत. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. अशा परिस्थितीत सरकारने पुढे येऊ अतिरिक्त दुधाच्या तयार झालेल्या भूकटीला अनुदान देऊन ती परदेशी घालवले पाहिजे. पुढील काळात दुधाचे उत्पादन वाढणार असल्याने हा निर्णय घेतला पाहिजे”.
दरम्यान, दुध दरप्रकरणात सरकारला अपयश का येत आहे असे विचारले असता राजू शेट्टी म्हणाले की, “दोन्ही सरकारला यात अपयश आले आहे. केवळ राज्य सरकारने उपाययोजना करुन हा प्रश्न सुटणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन दुध भूकटीच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच GST देखील मागे घेणे आवश्यक आहे. तोपर्यंत आमच्या दुधाचा खप वाढणार नाही”, असे राजू शेट्टींनी म्हटले.