काँग्रेसमधील ‘या’ २३ वरिष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र
नवी दिल्ली – काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष स्थानी सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला आता वर्ष झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाला उभारी देण्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे.
सत्ता गमावल्याच्या सहा वर्षानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मागील वर्षभरापासून पूर्णवेळ नेतृत्वाशिवाय असलेल्या काँग्रेसमध्ये आता अध्यक्षांच्या निवडीची मागणी होऊ लागली आहे. पक्षामध्ये अमूलाग्र बदल करण्याविषयी काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. भाजपा राजकीय आघाडीवर पुढे असून, निर्णायक असलेल्या देशातील तरुण मतदारांनी नरेंद्र मोदी यांना मतदान केले असल्याचा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी नमूद केला आहे. तरुणांचा काँग्रेसवरून विश्वास कमी होणं ही चिंतेची बाब असल्याचेही म्हटले आहे.
काँग्रेस पक्षामध्ये बदल करण्याची मागणी करणारे हे पत्र १५ दिवसांपूर्वी देण्यात आले आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला असून, पक्षाच्या अध्यक्षपदी पूर्णवेळ प्रभावी व लोकांमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“पक्षामध्ये व्यापक स्वरूपात सुधारणा करण्याबरोबरच, सत्तेचे विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षातंर्गत निवडणूका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या होत असलेल्या घसरणीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पक्षांने प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले नाही,” असे या नेत्यांनी म्हटले आहे.