ऐनवेळी कोकणात गाड्या सोडू नका राज्य सरकारचे रेल्वे अधिकाऱ्यांना आदेश
अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जाऊ पाहणार्या चाकरमान्यांंसाठी कोकणात विशेष गाड्या सोडण्याची तयारी मध्य रेल्वेनं दाखवली आहे. मात्र राज्य सरकारकडुन अद्याप परवानगी नसल्याने हे काम ठप्प आहे अशी जाहीर माहिती मध्य रेल्वे तर्फे देण्यात आली आहे. राज्य सरकारने कोकणात एसटी सोडण्याची घोषणा केली. तसेच सोबतच मध्य आणि पश्चिम रेल्वे ने कोकणात जाणार्या विशेष गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी केली. यानुसार संपुर्ण नियोजन केल्यानंतर मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेने बोर्डाकडे अंतिम मंजुरी मागितली. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली मात्र राज्य सरकारने ऐनवेळी कोकणात गाड्या सोडू नका असे तोंडी आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले असल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी कोकणात जाणार्या गाड्यांच्या वाहतुकीला ब्रेक लागला आहे.
मध्ये रेल्वेने यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले असून, यामध्ये मुळात कोकणात 11 ऑगस्ट पासुन ट्रेन सोडण्याचे नियोजन होते मात्र आदेशानंतर गाड्यांचे नियोजन रेल्वे अधिकाऱ्यांना पुढे ढकलावे लागले आहे असे स्पष्ट सांंगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री विशेष गाड्यांचे वेळापत्रक थांबवुन ठेवण्यास सांगितले आहे. हा विषय महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन असून याविषयी लवकरच निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रवाशांना विशेष रेल्वे चालविण्यास तयार आहे, मात्र महाराष्ट्र राज्य सरकारकडून अंतिम पुष्टी अद्याप झालेली नाही असे म्हणत रेल्वे ने आपली बाजु मांंडली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासन, बोर्ड आणि झोनल स्तरावरून महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात असुन याबाबत निर्णयासाठी राज्य सरकारने हिरवा कंंदील दाखवण्याची वाट पाहिली जात आहे. राज्य सरकारतर्फे या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अजुन तरी समोर आलेली नाही, मात्र कोकणात गाड्या सोडण्यासाठी ही आडकाठी का असा प्रश्न नागरिकांकडून आता केला जात आहे.