बंगालमधील भाजपाच्या 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जींच्या संपर्कात
कोलकाता – पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना पुन्हा परत पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. या “घरवापसी” आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून भाजपाचे बंगालमधील 4 खासदारांसह 21 आमदार व नेते ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर कोलकात्याचे 16 नगरसेवकही तृणमूल काँग्रेसमध्ये परत जाण्याच्या मनस्थितीत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत भाजपाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र भाजपाच्या पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदावरून भाजपा नेत्यांमध्येच युद्ध सुरू झाले आहे. भाजपा नेते दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांच्यामध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. या सत्ता संघर्षाची कल्पना दिल्लीतील भाजपा नेत्यांना आली आहे. मात्र त्यांनी अजून कुठचीही कारवाई केलेली नाही. सध्याचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे तिखट जिभेचे आहेत. त्यातही जे नेते तृणमूल काँग्रेस सोडून भाजपात आलेले आहेत त्यांना ते फारशी किंमत देत नाहीत व त्यांना टाकून बोलतात. त्यामुळेही 4 खासदारांसहीत 21 आमदार व नेते पुन्हा स्वगृही तृणमूल काँग्रेसमध्ये परत प्रवेश घेण्याच्या मनस्थितीत आहेत. त्याबाबत त्यांचे ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणे झाल्याचेही सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे काम पाहणारे भाजपा नेते कैलास विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेसचा भाजपा नेते व खासदार आमदार फुटण्याचा दावा फोल ठरविला आहे.