माथाडी कामगारांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील – इरफान सय्यद
माथाडी कामगारांना विमा कवच आणि रेल्वे प्रवास होणार सोय
पिंपरी |महाईन्यूज|
कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या संदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.
या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो माथाडी कामगारांना फायदा होणार आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडी सरकारचे शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी आभार मानले आहेत.
इरफान सय्यद म्हणाले की, सरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या १ लाखांहून अधिक असून सद्य:स्थितीमध्ये अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या, शासकीय धान्य गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प आदी ठिकाणी २८ हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत. या पुरवठा साखळीत अत्यावश्यक व जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. अत्यावश्यक सेवेतील घटकांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण माथाडी कामगारांना व सुरक्षा रक्षकांना देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटना, लोकप्रतिनिधींच्यावतीने करण्यात येत होती. त्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला.
कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना वित्त विभागाच्या दि. २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. यानुसार राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. तसेच माथाडी कामगारांची सेवा कोविड संसर्गाचे हॉटस्पॉट भागातही असल्याने या निर्णयाचा मोठा लाभ माथाडी कामगारांना होणार आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानतो. यापुढेही माथाडी कामगारांच्या बाजूने शासन खंबीरपणे उभे राहील, अशी आशा व्यक्त करतो, असे या पत्रकात म्हटले आहे.
”तत्कालीन भाजप सरकारने माथाडी कामगारांच्या विरोधात अनेक कटू निर्णय घेऊन कामगारांना अडचणीत आणले होते. सहकारी संस्था, पतपेढी किंवा सहकारी, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची हप्त्याची रक्कम माथाडी कामगारांच्या वेतनातून माथाडी मंडळातर्फे घेण्यात येऊ नये अशा स्वरूपाचे निर्णय घेऊन सहकार संस्थाचे जाळेच उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले होते. त्या तुलनेत सध्याच्या उद्धवजींच्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून माथाडी कामगारांच्या बाजूने अनेक धाडसी निर्णय घेऊन हे कामगारांचे सरकार असल्याचे या निर्णयातून दाखवून दिले आहे”
- इरफानभाई सय्यद – कामगार नेते