राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन थांबवावे, आम्ही राम मंदिर थांबवू: खासदार सुजय विखे
अहमदनगर : “राष्ट्रवादीचे नेते, आमदार, मंत्री यांनी रस्त्यांची भूमिपूजन आणि उद्घाटन करणे थांबवावे, आम्ही राम मंदिराचे भूमिपूजन थांबवू” असे थेट आव्हान भाजप खासदार सुजय विखे यांनी दिलेले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन अहमदनगरमधील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. “राष्ट्रवादीचे कित्येक आमदार आणि मंत्री दररोज वेगवेगळ्या रस्त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करत आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे त्यांनी भूमिपूजन थांबवावी मग आम्ही देखील थांबू, असे सुजय विखे म्हणाले आहेत.
“राम मंदिर आपल्या देशाच्या आस्थेचा प्रश्न असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे” असा टोला खासदार सुजय विखे यांनी लगावलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला सोलापूर दौऱ्यात दिला होता. “आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असं ते म्हणालेले होते.
दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन हा इतर सण-उत्सवांसारखा दरवर्षी येणारा उत्सव नाहीये. त्यामुळे राम मंदिराला धर्माशी जोडण्याचे काहीही कारण नाहीये. असा सल्ला सुजय विखे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना दिलेला आहे.