महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे बालाजीनगर, लांडेवाडीतील सुमारे 300 घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/4bhosari_20rain_20water_20in_20home.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
काल शनिवारी (ता. २५) रात्री जोरदार पाऊस झाल्याने भोसरीतील बालाजीनगरमधील सुमारे तीनशे, तर लांडेवाडीतील डॅा. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील पंचवीस घरांमध्ये तुंबलेल्या गटाराचे पाणी शिरले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. काही विद्यार्थ्यांची पुस्तकेही पाण्यात भिजली. घरात तीन फुटांपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली. लॅाकडाउनमुळे हाताला काम नाही. त्यातच सरकारने दिलेली शिधाही पावसाच्या पाण्यात भिजल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बालाजीनगमधील नाल्याची पावसाळ्यापूर्वी योग्य सफाई केली नाही. नाल्याला जाळी बसविल्याने कचरा अडकून पाणी तुंबले आहे. या नाल्यात तीन फुटांच्या तीन पाइप टाकण्यात आल्या आहेत. यापैकी एका पाइपमध्ये माती साचलेली होती. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई होणे गरजेचे होते. लांडेवाडीतील डॅा. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील नाल्याजवळच्या सुमारे पंचवीस घरांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्य, विद्युत उपकरणे, फर्निचरचे नुकसान झाल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.
रात्री साडेआठ वाजता अग्निशमन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी या नाल्यात अडकलेला कचरा काढून पाण्यास वाट करून दिली. रात्री अकरा वाजेपर्यंत घरातील पाण्याचा निचरा सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरजवळ नाल्याला पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी लाइन जोडली आहे. त्याचप्रमाणे या नाल्याजवळ अरुंद पूल असल्याने या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे आलेला कचरा अडकतो. परिणामी पाणी तुंबते व ते वस्तीत शिरते. महापालिकेने या पुलाची रुंदी आणि उंची वाढविली पाहिजे, अशीही मागणी नागरिक करत आहेत.