भाजप-शिवसेनेची युती म्हणजे ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेची गरज असल्याने शिवसेनेचा बुक्क्याचा मार भाजपला सहन करावा लागत आहे. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचे अध्यक्ष अमित शहा तसेच, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, राजवर्धन राठोड, सुषमा स्वराज, नितीन गडकरी असे पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या पत्रकारांशी संवाद साधत आहेत. पक्षाची तसेच मोदी सरकारची आत्तापर्यंतची उद्दिष्टपूर्ती, आगामी कार्यक्रमांची माहिती नेत्यांनी दिली.
देशातील २० राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यापैकी त्रिपुरा, आसाम, झारखंड आदी काही राज्यांमध्ये भाजप आघाडीचे सरकार चालवते. पण, या कुठल्याही राज्यांमध्ये भाजपला घटक पक्षांचे विरोधाचे राजकारण सहन करावे लागत नाही. फक्त महाराष्ट्रातच शिवसेनेचा विरोध सहन करून भाजपला सत्ता टिकवून ठेवावी लागते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. त्याआधी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्याने भाजपला शिवसेनेची साथ कायम ठेवावी लागणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेने कितीही तीव्र विरोध केला तरी सहन करा, अशीच भूमिका भाजपने घेतलेली आहे. आमची सहन करण्याची क्षमता खूप आहे, असे भाजप नेत्याने प्रांजळपणे सांगितले.