#CoronaVirus: मुंबई, पुणे, जयपूर, इंदूर, कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर- गृहमंत्रालय
देशात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. अशात गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, जयपूर, इंदूर, कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं आहे की, लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने लोकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका देखील वाढला आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी सर्वांना मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असे सांगितले आहे. तसंच, लॉकडाऊनमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात हिंसाचार होत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याचसोबत काही शहरांमध्ये गाड्यांची रहदारी सुद्धा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
गृह मंत्रालयाने सांगितले की, कोविड -१९ परिस्थितीचे आकलन करण्यासाठी सरकारने ६ आंतर-मंत्रालयीन केंद्रीय टीमची स्थापना केली आहे आणि राज्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मंत्रालयाने असे देखील सांगितले की, ही टीम लॉकडाउनची अंमलबजावणी, आवश्यक सामग्रीची पूर्तता आणि पुरवठा तसंच आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षिततेवर भर देतील. देशात कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार २५६ वर पोहचला असून आतापर्यंत ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.