भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्यांचं प्रमाण 80 %
इतर देशांच्या तुलनेत पहायला गेलं तर भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गातून बरे झालेल्यांचं प्रमाण हे ८० % आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही त्या तुलनेत २०% आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आज झालेल्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
जगाच्या पाठीवर इतर देश जे कोरोना विषाणूशी लढा देत आहे त्यांच्या तुलनेत आपल्या देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे तर मृत्यूचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत कमी आहे, असं त्यांनी परिषदेत सांगितलं. भारतात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची बाधा झालेले १ हजार ७ रुग्ण समोर आले आहेत तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
देशांत रुग्णांची संख्या वाढत आहे, कारण आपण स्त्राव चाचण्यांची संख्या देखील वाढवत चाललो आहोत. १५ मार्च ते ३१ मार्च या काळात रुग्णांची संख्या सरासरी २.१ नं वाढत होती मात्र आता १ एप्रिलपासून ही वाढ सरासरी १.२ वर आली आहे. याचाच अर्थ देशात रुग्णांच्या संख्येतील वाढ ४० % नी घटली आहे अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे.